Sunday, June 14, 2020

समुद्र…

अगदी लहानपणापासून माझं समुद्रावर भारी प्रेम. कोकणात थेट किनारपट्टीवर गाव. त्यामुळे लहानपणी मे महिन्याच्या सुट्टीत आमची समुद्र भेट ठरलेली असायची. सोनेरी वाळूचा विस्तीर्ण पसरलेला किनारा...त्यावर वाकडे वाकडे चालणारे छोटे खेकडे...कडेला नारळाची झोकावणारी उंच झाडं आणि समोर अफाट समुद्र... फेसाळणाऱ्या उंचच उंच लाटांचा अफाट, अचाट समुद्र. उजवीकडून डावीकडे मान फिरवली तरी न संपणारा. सूर्यास्ताच्या वेळी ते लालबुंद सूर्यबिंब स्वतःत विरघळवून टाकणारा...समुद्र…

अगदी लहान असताना बाबांचा हात धरून पाण्यात पाय बुडवायला जायला मज्जा यायची. लाटेचं पाणी ओसरताना पायाखालून वाळू सरकवून जायचे आणि बाबांच्या हातावरची पकड नकळतच अधिक घट्ट व्हायची. पायाखालून वाळू सरकत असेल तर बाबा आहेत सांभाळायला हा विचार तेव्हापासूनच घट्ट रुजला होता मनात. थोडं मोठं झाल्यावर दादाबरोबर वाळूचे किल्ले बांधायचा उपक्रम सुरू झाला. तेव्हा beach toys नव्हते त्यामुळे नारळाच्या करवंट्या, झाडाच्या काड्या अशी indeginous अवजारं घेऊन बांधकाम चालायचं. अंधार पडायला लागला की आमची स्वारी किल्ले सोडून घराकडे निघे आणि दुसऱ्या दिवशी जाऊन परत ते किल्ले शोधे. तेव्हा वाळूचे किल्ले क्षणभंगुर असतात हे कुठे माहीत होतं. पुढे मोठं होता होता समुद्राच्या रुपाइतकाच त्याचा आवाज जवळचा वाटू लागला. डोळ्यात देखण्या उसळत्या लाटा आणि कानात त्यांचा मोहिनी घालणारा आवाज यावर कित्येक तास काढू शकत होते मी. यापेक्षा romantic आयुष्यात काही असूच शकत नाही असं ठाम मत होतं माझं. काही शांत समुद्रही भेटले...ज्यांच्या लाटा किनाऱ्यावर धडकायच्या नाहीत तर फक्त किनाऱ्याला स्पर्श करून जायच्या. शाळेतल्या शिस्तशीर मुलांप्रमाणे…त्यात अवखळपणा नसायचा. मग काहीतरी चुकल्यासारखं वाटायचं. पण कोणत्या का रूपात होईना समुद्र दिसला असं स्वतःला समजावून मी पुढे निघायचे. कोलंबसाच्या गर्वगीतातल्या शेवटच्या दोन ओळी मनाच्या नेहमीच विशेष जवळच्या राहिल्या. शांत समुद्र दिसला की त्या आपोआप ओठावर यायच्या…'अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा किनारा तुला पामराला'...खवळलेल्या समुद्राला हे बोलायची कधी हिंमत नाही झाली पण. अंदमानच्या राधानगर किनाऱ्याची निळाई काही औरच होती...अगदी पुलंच्या निळाईची आठवण करून देणारी. त्यानंतर बरीच वर्षं समुद्र एक मित्र वाटायचा...कधी काळी भेटणारा पण अगदी कालच तर भेटलो होतो असे वाटून गप्पा मारणारा. कुठे माहीत होतं की हे समीकरण कधी काळी बदलणार होतं.

बाबा गेल्यानंतर काही दिवस सगळे विचार, भावना गोठल्यासारख्या झाल्या होत्या. मी धड रडले सुद्धा नव्हते ते गेल्यावर. भेटायला येणाऱ्या लोकांशी बोलत तर होते. पण विषय हाच...की गेल्या आठ महिन्यात बाबांनी कशी आणि किती झुंज दिली. बाबा त्या आठ महिन्यांच्या पलीकडे जाऊन सुदधा खूप काही होते. पण डोकं इतकं बधीर झालं होतं की त्यांच्या आठवणी कुठेतरी हरवल्या सारख्या झाल्या होत्या. कुठेतरी जाऊन कोणाकडे तरी मन मोकळं करावं असं वाटत होतं पण कसं ते कळत नव्हते. आणि एकेदिवशी मी ऑफिस मधून निघून मरीन ड्राईव्ह गाठले. कट्ट्यावर चढून बसले. कानात earphones सरकवले...मी फोन वर बोलतेय असं वाटावं म्हणून. आणि बोलायला सुरुवात केली. समोर तोच समुद्र होता...अथांग पण धीरगंभीर…शांतपणे मला ऐकणारा...माझ्या बाबांसारखा. मी पुढचा अर्धा तास भरभरून बोलले...भरपूर रडले...आणि त्यानंतर मला माझ्या मी शोधत असलेल्या आठवणी सापडल्या...माझ्या आणि माझ्या बाबांच्या आठवणी. त्यादिवसानंतरही मला बराच वेळ लागला या सगळ्यातून बाहेर यायला. पण मला एक हक्काची जागा सापडली जिथे मला माझ्या बाबांच्या आठवणी जगता येणार होत्या. त्यादिवसापासून समुद्र मनाच्या अधिकच जवळ आला.

आजही समुद्र किनारी गेलं की बाबांच्या आठवणी जाणवतात. अस्ताला गेलेलं सूर्यबिंब सांगतं की या जगात नश्वर असं काहीच नाही...दूर हिंदकळणाऱ्या होड्या सांगतात की time to move on. लाटांचा आवाज सांगतो…'मी आहे...मी नेहमीच असेन'. मी पाण्यात पाय ठेवून उभी राहते...लाट ओसरते आणि पायाखालून वाळु सरकते...मी पाय अधिक घट्ट रोवून उभी राहते...बाबा आजही खाली पडू देत नाहीत...

No comments:

Post a Comment

Women's Day

#womensday2023  This morning when my maid didnt turn up, I took over the charge and cooked our meal like any other day. The last minute chan...